शोभा भडके
भाग – 13
“मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय…” राम सगळ्यांवर एक नजर टाकून म्हणाला.
दादाचं बोलणं ऐकून घरचे कसे रिॲक्ट होतील, याच विचाराने पवन आणि आरूची बेचैनी वाढली होती. कारण, दोघांना कल्पना होती तो काय बोलणार त्याची! पवन आणि राम यांच्यात रात्रीच या विषयावर बोलणं झालं होतं. लवकरात लवकर सियाच्या पाहिल्या लग्नाबद्दल घरच्यांना सांगायला हवं… त्यांचं हेच बोलणं आरुने पण ऐकलं होतं आणि तिलाही असंच वाटत होतं…
लग्न आठ दिवसांवर आलं तरीही दादाने अजून घरी का नाही सांगितलं? म्हणून आता आपणच त्याच्याशी बोलायला हवं, असा विचार करून ती त्याच्या रूमकडे येत होती, तेव्हा दोघांचं बोलणं तिने ऐकलं. आता आपण बोलायची गरज नाही, असा विचार करून ती परत गेली होती.
कालच सगळे पुण्याला आले होते. लग्न पुण्यातच होणार म्हणून ते सगळे सरू आत्याच्या घरी मुक्कामाला होते. बाकीचे नातेवाईक लग्नाच्या एक दिवस आधी येणार होते. पण त्याआधी सियाच्या पहिल्या लग्नाबद्दल घरच्यांना कल्पना देणं गरजेचं होतं. ऐनवेळी सगळ्यांसमोर ही गोष्ट आली तर, खूप मोठा तमाशा होणार होता. रामला स्वतः आपल्या फॅमिलीला याबद्दल सांगायचं होतं. म्हणूनच त्या दिवशी रामला मनोमन वाटत होत की, आत्ता सगळ्या भावकी आणि गावकऱ्यांसमोर हा विषय शिव किंवा त्याच्या फॅमिलीने काढून नये…
कारण ते गाव होतं… लग्न तुटण्यासाठी तिलाच दोष देऊन मोकळे झाले असते, हिच्यातच काही खोट असेल म्हणून संसार टिकवू शकली नाही, असं बोललं गेलं असतं. एवढंच काय तर, हे कळल्यावर आई आणि भाऊ सुद्धा काय म्हणतील? लग्नाला विरोध करतील की घेतील समजून? कदाचित समजून घेतीलही, कारण याला प्लस पॉइंट आरू होती! मागील फोटो प्रकारामुळे तिच बरीच बदनामी झाली होती. त्यामुळे नाईलाजाने का होईना, त्यांना मान्य करावं लागणार होतं. खरंतर, हा स्वार्थीपणाचा विचार होता… त्याच्या मनाला ही गोष्टसुद्धा खात होती. परिस्थितीच तशी ओढवली होती.
त्याचमुळे त्याने पुण्याला आल्यावर दुसऱ्या दिवशीच सकाळी सगळ्यांसमोर हा विषय काढायंच ठरवलं होतं. सरू आत्या त्यांच्या फॅमिलीचाच भाग असल्यामुळे त्यांना हे माहीत असायला हवं होतं.
हेही वाचा – लग्नाची बोलणी सुरू झाली, तेवढ्यात आरू म्हणाली…
“हां बोल की, काय बोलायचंय ते! सकाळ सकाळ सभा लावलीस… आधीच कामं खोळंबलीत!” आई जरा वैतागतच म्हणाली. लग्न आठ दिवसांवर आल होतं आणि अजून खरेदीची सुरुवात पण केली नव्हती, म्हणून त्यांची चिडचिड होत होती.
“कले जर शांत बस की, काय म्हणतोय ते बघ की!” सखाराम भाऊ नेहमीच्या सुरात म्हणाले.
“हां मी कुठं काय म्हणते? ऐकायलाच बसलो की इथं… पण त्यो काय बोलायचं नाय…” कलावती.
“ताई, भाऊ तुम्ही जरा शांत होता का? राम काय झालं? कशाचं टेन्शन आलंय तुला? पैशाचं काही असेल तर आपण सगळे मिळून करू ना मॅनेज!” मामा त्या दोघांना शांत करत रामला म्हणाले. कारण बराच वेळापासून राम, तसंच आरू आणि पवन टेन्शनमध्ये दिसत होते. बेचैनी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हावभावातून काहीतरी गंभीर विषय आहे, याची त्यांना कल्पना आली होती.
रामने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे घट्ट मिटून परत उघडले… पुन्हा सगळ्यांवर नजर टाकली आणि बोलू लागला,
“सिया… सियाचं आधी लग्न झालेलं आहे, तिचा घटस्फोट झालाय! माझं तिच्यावर प्रेम होतं. आम्ही लग्न करणार होतो. पण मी… मी फसवलं तिला! जेव्हा तुम्हाला सगळं सांगायची वेळ आली, तेव्हा माझ्याने हिम्मत नाही झाली… मी प्रेम तर केलं, पण लग्नासाठी नकार दिला. तिचा विश्वासघात केला. त्यातच तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. पण ते जास्त काळ टिकलं नाही. माझ्यामुळे तिचं आयुष्य बरबाद झालं. मी जबाबदार आहे, या सगळ्याला…” तो एका दमात सगळं बोलून मोकळा झाला.
त्याने चुकूनही त्याला तिच्या बाबांमुळे माघार घ्यावी लागली. त्यांच्यात जी गरिबी श्रीमंतीची दरी होती, त्यामुळे त्याला तिचा हात अर्ध्यावर सोडावा लागला किंवा तिची साथ सोडायला त्याला मजबूर केलं गेलं… हे सगळं तो बोलला नाही. त्याने खाली मान घालून सगळं सांगितलं आणि डोळे मिटून घेतले… नंतर डोळे उघडून सगळ्यांकडे पाहिलं… त्यांच्या प्रतिक्रियेची तो वाट पाहात होता… आरू आणि पवनने पण श्वास रोखून सगळ्यांकडे पाहिलं… खासकरून आरूची नजर तिच्या आईवर होती. कारण, आई-भाऊंची प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची होती!
आपल्या आईच्या विचारांची तिला कल्पना होती. मागासलेल्या विचारांचा खूप प्रभाव होता… अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती – जसं की विधवा बाईने शुभकार्यात सहभागी होऊ नये, जिला मुल होत नाही, अशा स्त्रीने गर्भार बाईची ओटी भरू नये, एवढंच काय तर, दुसऱ्यांदा लग्न झालेली स्त्री कुठल्याही सुवासिनीच्या कार्यात सहभागी होत नाहीत किंवा तिला या सगळ्यांपासून वेगळं ठेवलं जातं. तिला पावलो पावली हे जाणवून दिलं जातं की, तुझा पहिला नवराच तुझं सौभाग्य होता आणि आता दुसरं लग्न केल्यावर तुला कुठलाच अधिकार उरला नाही… हे असेच विचार होते आईचे! त्यांच्या गावी सगळ्याच स्त्रियांचे हेच विचार होते… यात त्यांचाही दोष नव्हता… त्यांचं अज्ञान याला जबाबदार होतं. पिढ्यान् पिढ्या चालत आलेले विचार कसे बदलणार? यावरून नेहमीच आरू आणि तिच्या आईचं भांडण व्हायचं. आईला कधीच तिचं पटलं नाही… त्यामुळेच तिला जास्त टेन्शन आलं होतं.
रामचं बोलून झालं. पण यावर कोणीच काही बोलत नव्हतं. एकदम शांतता पसरली होती. राम त्यांच्या बोलण्याची वाट पाहत होता.
“आई बोल ना काहीतरी! हे बघ मला माहीत आहे, तुला राग आला असेल… तू असं पण म्हणशील, त्या लोकांनी आधी का नाही सांगितलं… फसवलं वगैरे…” राम बोलतच होता, तोच कलावती म्हणाल्या,
“त्या लोकांनी त्याच दिवशी सांगितलं आम्हाला खरंखरं… काय बी लपवलं नाय त्यांनी!” कलावती म्हणाल्या आणि इकडे राम, आरु आणि पवन यांचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले. त्यांचा विश्वासच बसेना, आपण नक्की हेच ऐकलं ना?
“आई काय बोलतेस तू? तुम्हाला सांगितलं! असं कसं सांगितलं? मी म्हणाले होते त्यांना, आत्ताच काही सांगू नका म्हणून… एवढं पण ऐकलं नाही? किती खोटारडे आहेत ते! शी बाई, असं कोण करत का!” आरू रागातच म्हणाली. तिला रागच आला होता शिवचा! पण तिचं हे बोलणं ऐकून पवन आणि राम विस्फारून तिच्याकडे पाहू लागले तिच्याकडे… तिच्याही लक्षात आलं रागाच्या भरात आपण काय बोलून गेलो ते! तिने दाता खाली जीभ चावत डोळे बंद केले आणि एक डोळा उघडून रामकडे पाहिलं तर, तो नजर रोखून तिच्याकडेच पाहात होता. (म्हणजे, तुला कसं माहीत?) त्याच्या नजरेचा रोख पाहून ती गडबडली…
“हे बघ पोरा, जे काही असंल ते आपल्यातच राहायला पाहिजे… आरूसंगट जर असं काही झालं नसतं तर, आम्हाला कधीच पटलं नसतं… पण खरं बोलती, आरू जवा आपल्यावर येळ येते, तवा सगळं चूक बराबर बाजूला व्हतं… आपली आब्रू वाचिवली त्या पोरानं! उपकार हाईत आपल्यावर त्यांचं… लई मोठे लोक ते, त्यांच्या पोरीला बी आपण सांभाळून घ्यायचं… लोकाला काय नाव ठेवाया पाहिजेल निसतं. हे पटलं हाय मला. त्यामुळं परत हा इषय काढायचा नाय! तिचं पहिलं लगीन झालंय, हे गावकडं कोणालाबी कळू द्यायचं नाय…” कलावती रामला बजावत म्हणाल्या.
तिचं बोलणं ऐकून रामला डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं झालं आणि समाधानही! आई आणि भाऊंनी कुठलाही राग न धरता सियाला स्वीकारलं. पण कुठेतरी या सगळ्यात आरू भरडली जाते, याचा सल मनात होता…
आरूने मात्र मनातच हुश्श केलं होतं! दादाच्या डोळ्यातला प्रश्न आणि त्याचा राग… कदाचित तो या सगळ्या गोंधळात विसरून जाईल…
“बरं चला उद्या आपल्याला खरेदीला जायचंय… चल आरू आपण लिस्ट बनवू. तुला पार्लरला पण घेऊन जायचंय…” वातावरण जरा गंभीर झालं होतं, त्यामुळे भावना विषय बदलत म्हणाली. लग्न म्हटलं की, खूप सारी तयारी… तशी बरीच तयारी करून झाली होती त्यांची. सवाष्णी… देवदर्शन, बांगड्या भरणं… रुखवत… पापड कुरडया… नातेवाईकांचे मानपानाच्या कपड्यांची खरेदी… सर्व झालं होतं. आता फक्त आरूच्या सासरच्या लोकांच्या मानपानाची खरेदी आणि नवरा-नवरीच्या दागिने आणि कपड्यांची खरेदी बाकी होती.
पवनने पण लग्नासाठी हॉल, कॅटरर्स, बँड वगैरेचे बुकिंग केले होते. थोडक्यात काय तर, लग्नाची सगळी तयारी आपण करणार असल्याचे राम म्हणाला होता, त्याच्या ऐपतीप्रमाणे! त्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं, तुम्ही तुमचा बडेजावपणा अजिबात दाखवायचा नाही. दोन्ही लग्नं त्याच पद्धतीने होतील.
सगळे पुढच्या गोष्टींची चर्चा करत होते, तोच रामचा फोन वाजला. अर्थात, शिवचाच होता.
“हॅलो…” राम.
“…….” तिकडून काहीतरी बोलणं झालं.
“हं… ठीक आहे, येऊ आम्ही…” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
“काय रं कोणाचा फोन होता?” सखाराम यांनी विचारलं.
“भाऊ ते म्हणाले की, तुमच्या मनाने मानपानाच्या भानगडीत पडू नका…” राम.
“आरं पर, असं कसं घ्यावा तर लागंल ना? असं असतंय व्हय कुठं?” कलावती चिंतेने म्हणाली. गावाकडील लोक सगळ्या रीतिभाती जिथल्या तिथे झाल्या पाहिजेत या मताचे…
“मामी आगं, ते लोक खूप मोठे आहेत गं आपल्यापेक्षा. आपल्याला नाही जमणार त्यांच्या मनासारखा मानपान करायला, त्यामुळे बरोबर आहे त्यांचं. आपण आपल्या मनानेच घेऊ काय घ्यायचंय ते. ते मोठ्या मनाने स्वीकारतायेत तेच खूप आहे…” पवन मामीला समजावत म्हणाला.
हेही वाचा – …म्हणून सियाच्या लग्नासाठी बाबा झाले तयार!
“उपकार नाही करत ते आपल्यावर! सियावर माझं प्रेम आहे आणि मी तिला ओळखतो… पण बाकी लोक किती स्वार्थी आहेत, ते मला चांगलंच माहीत आहे.” सियाच्या वडिलांचा चेहरा आठवत राम म्हणाला.
कुठे ना कुठे त्याला शिवमध्ये पण तोच स्वार्थ दिसत होता. स्वतःच्या बहिणीच्या सुखासाठी आरूच्या परिस्थितीचा फायदा घेतला, असंच त्याला वाटत होतं. म्हणून तो त्याचा राग करत होता.
“दादा अरे, असं का बोलतोयस?” पवन.
“बरं, सोडा जे झालं ते झालं… आता आयुष्याची नवी सुरुवात करतोयस तर मनापासून कर राम! मनात राग धरू नकोस. शेवटी जे झालं ते आपण बदलू शकत नाही. वाईटातून काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करू…” एवढा वेळ शांत असलेले पवनचे बाबा (मामा) रामच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
“हो मामा… बरं, त्यांनी आरूला घेऊन बोलावलं आहे… खरेदीसाठी,” राम.
“बरं, तुम्ही दोघं जाऊन या. गावाकडून पाहुणे येणार आहेत तर, राहण्याची सोय करतो आम्ही” मामा.
शिवने एका ज्वेलरी शॉपमध्ये बोलावलं होतं, आरू आणि सियासाठी मंगळसूत्र तसेच इतर दागिने खरेदी करायचे होते. राम आरू आणि भावनाला घेऊन गेला. कोण कोण येणार ते काही माहीत नव्हतं.
क्रमशः
(आज जो विषय मी मांडला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहीत असेल की नाही, याची कल्पना नाही. मी मात्र माझ्या आसपास हे बघितलंय. मी गावाकडची असल्यामुळे मला माहीत आहे आणि हे विचार फक्त गावातच नाही तर, शहरात पण अजूनही रुजलेले आहेत. अशांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी काहीच उपयोग होत नाही. एवढंच काय तर जिच्यासोबत हे सगळं घडतं, तिला देखील या गोष्टी मान्य असतात! आणि ती स्वतःहूनच बाजूला होते. असो. माझं काही चुकलं असेल तर माफ करा.)

