Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»कवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण
    ललित

    कवी गोविंदाग्रज यांची कविता ‘एखाद्याचे नशीब’… एक रसग्रहण

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 28, 2025Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, एखाद्याचे नशीब, कवितेचे रसग्रहण,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संगीता भिडे (कमल महाबळ)

    काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी

    काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी

    काही जाऊनि बैसती प्रभुपदी, पापापदा वारी ते

    एखादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते।

    कोणी पर्वत आपुल्या शिरी धरी हेमप्रभा शीतला

    कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला

    कोणाला वनदेवता वरितसे मोहात जी नाहते

    एखाद्यामधुनि परंतु जळती ज्वाला नदी वाहते ।

    झाडे जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती

    स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती

    सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते

    एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते!

    चाले खेळ असा जगात, बहुदा सौख्यात सारे जरी

    एखादा पडतो तसाच चुकुनी, दुःखार्णवी यापरी

    पाही कोण अशा हताश ह्रदया, जो तो असे आपला

    देवा, तू तरी टाकी अश्रू वरूनी, त्यासाठी तो तापला

    – कवी गोविंदाग्रज

    रसग्रहण

    कवी गोविंदाग्रज म्हणजेच प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांची ‘एखाद्याचे नशीब’ ही कविता वाचल्यावर सर्वप्रथम जाणवते ते, आयुष्याचे अत्यंत प्रमुख सूत्र… हे सूत्र म्हणजे प्रत्येक जण आपले नशीब सोबत घेऊनच जगत असतो. परंतु जो दुःखसागरात डुंबलेला असतो, त्याच्यासाठी दोन अश्रू ढाळायलाही कोणाला सवड नसते.

    ही कविता वाचल्यावर अजून एका कवितेची आठवण होते, ती म्हणजे ‘दोन फुलांची कथा’ ही. याही कवितेत एकाच वेलीवरची दोन फुले कशी वेगळे नशीब घेऊन जगतात याचे वर्णन केले आहे. एक फूल देवाच्या मस्तकी विराजमान होते तर, दुसरे प्रेतावर चढते. हाच भाव उपरोक्त कवितेतही आढळतो.

    हेही वाचा – पोटभर आशीर्वाद

    पहिल्याच कडव्यात गोविंदाग्रज म्हणतात, काही फुले स्वर्गातील देवतांच्या शिरी विराजमान होतात, तर काही रसिक आपल्या हृदय मंदिरात या फुलांना धारण करतात. जो परमेश्वरप्रभू पापक्षालन करतो, अशा प्रभूच्या पायाशी काही फुलांना स्थान मिळते. एखाद्या फुलाचे नशीब मात्र असे दुर्दैवी की, ते बिचारे प्रेताला शृंगारण्यातच खर्ची होते.

    प्रत्येक पर्वताचे नशीब सुद्धा वेगळे. एखादा पर्वत आपल्या मस्तकावर शीतल अशा हिमाचे, बर्फाचे तेज धारण करतो तर, एखाद्याच्या पोटातून निर्मळ अशा मोठमोठ्या नद्या वाहतात. एखादी वनदेवता आनंदाने न्हाऊन निघते आणि त्या पर्वतालाच वरते. पण एखादा पर्वत असा की, त्याच्या उदरातून इतरांना जाळत जाणारी ज्वालानदी वाहते.

    झाडे आपले दोन हात (म्हणजे जणू काही दोन पाने) जोडून मेघाला प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेचे फळ म्हणजे पानापानांवर स्वच्छंदपणे जलबिंदू नाचू लागतात. झाडांना नवीन पालवी फुटते. फुले त्यावर विलसू लागतात. झाडे पूर्णत: शोभायमान होतात. पण एखाद्या झाडाचे नशीब असे की, पाणी बरसणारा मेघ त्यावर वीज टाकून मोकळा होतो आणि ते झाड अंतरबाह्य जाळून पिळून निघते. सारे होत्याचे नव्हते होते.

    असा हा एकूण सुखदु:खाचा खेळ या जगात अव्याहतपणे चालताना दिसतो. वरवर सारेच सुखात आहेत, असे भासते; पण एखाद्याचे नशीब असे की, तो अंतरबाह्य दुःखसागरात बुडलेला असतो. या जगात प्रत्येकजण एवढा आत्ममग्न असतो की, या हताश ह्रदयाकडे बघायला, त्याला धीर द्यायला, त्याचे सांत्वन करायलाही त्याच्याकडे सबड असत नाही.

    अशी ही जगरहाटी पाहिल्यावर कवी देवाला प्रार्थना करतो की, ज्याने या संसारात अनंत ताप साहिले आहेत, त्याच्यासाठी तरी तू अश्रू ढाळ.

    प्रस्तुत कवितेशी थोडे फार साधर्म्य साधणारी कवी गोविंदाग्रज यांची आणखी एक कविता आहे. त्यातील आठवतात तेवढ्या पंक्ती पुढे देते –

    यावज्जीवही काय मी न कळले आप्तांप्रति नीटसे!

    मित्रांतेही कळे न गुढ, न कळे, माझे मलाही तसे

    अज्ञाता! मरणोत्तर प्रकट ते होईल तूते कसे!

    कोठे आणि कधी तरी जगती मी होऊन गेलो असे ।।

    परीक्षणार्थ दिलेली कविता कवीने शार्दूलविक्रिडित या वृत्तात. बांधली आहे. वरवर पाहता हे वृत्त फार सोपे वाटते, कारण मंगलाष्टकांना हेच वृत्त वापरले जाते (दुर्दैवाने त्यात शब्दांची वाट्टेल तशी ओढाताण होते!)

    या कवितेत मात्र गण आणि मात्रा यांची लय अत्यंत उत्तमरित्या साधली आहे. कोणत्याही शब्दाची ओढाताण करावी लागत नाही, त्यामुळेच या कवितेला उत्तम नाट्यमाधुर्यही लाभले आहे.

    हेही वाचा – अनोखा बंधूभाव

    थोडक्यात प्रत्येकाचे जगणे ‘असणे आणि नसणे’ या दोन बिंदूतून कसे जात असते याचे उत्कृष्ट वर्णन कोठेही शब्दबंबाळ न होता वर्णिले तर आहेच, पण कवितेच्या शेवटच्या पंक्तित उत्कर्षबिंदू साधला आहे, जो तुमच्या आमच्या हृदयाला जाऊन भिडतो आणि प्रत्येकालाच अंतर्मुख करतो आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यास प्रवृत्त करतो.

    इति अलम् !


    (साधारण 1997 साली ‘नौपाडा हिंदू भगिनी मंडळ मंडळ’ ठाणे या संस्थेतर्फे आयत्या वेळी ‘काव्यरसग्रहण’ स्पर्धा घेण्यात आली आणि या रसग्रहणास प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn