Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»नावात काय आहे?
    ललित

    नावात काय आहे?

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 26, 2025Updated:March 17, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, धुळवड, आयुष्याचे रंग, सकारात्मकता, आरवची धुळवड, नैराश्याची धूळ,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    पॅसेंजरने उतरून मी स्टेशनबाहेर आलो. डॉक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते. माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता. मला भूक लागली होती. मी स्टेशनजवळची हॉटेल्स पाहिली, पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डॉक्टरांकडे जायचं होतं, त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं. मी एक-दोनदा तिथं चहा प्यायलो होतो. तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता… शिवाय, मला भूकही लागली होती!

    माझी पावलं आपसूकच त्या हॉटेलकडे वळली. हॉटेल बऱ्यापैकी मोठं होतं. स्वच्छही दिसत होतं, पण तरीही तिथं अजिबात गर्दी नव्हती. वीस-पंचवीस टेबलांपैकी फक्त दोन टेबलांवर दोन माणसं बसली होती. मागे मी आलो, तेव्हाही या हॉटेलमध्ये गर्दी नव्हती. या हॉटेलची क्वालिटी वाईट तर नाही? नाहीतर, अगदी मोक्याच्या ठिकाणी असूनही तिथं गर्दी का नसावी? प्रश्न पडून मी घुटमळलो आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ असा विचार करुन मी पायऱ्या उतरणार तेवढ्यात गल्ल्यावरच्या माणसाने आवाज दिला… “का हो साहेब, काय हवं होतं?”

    “काही नाही… नाश्ता करायचा होता!”

    “अहो, मग या ना… आलूवडा आहे, मिसळ आहे, भजी, पोहे, चहा, कॉफी सगळं आहे… या सगळं गरम मिळेल!”

    मी थोड्या नाराजीनंच आत येऊन एका टेबलवर बसलो.

    वेटर लगबगीने पुढं आला, “काय आणू साहेब?” त्यानं विनम्रतेनं विचारलं.

    “गरम काय आहे?”

    “मिसळ एकदम गरम आहे. बाकी वडा, भजीही ताजे आहेत…”

    “एक मिसळ आण…”

    तो गेला आणि दोनच मिनिटांत मिसळपाव घेऊन आला‌. सोबत दही, चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि एका मोठ्या वाटीत मिसळीचा रस्सा… मिसळीचा वास तर खूप छान येत होता…

    मी कांदा टाकून मिसळीचा घास घेतला. मस्तच होती मिसळ! पावही एकदम सॉफ्ट आणि ताजे होते… मिसळ खाताखाता मी हॉटेलमध्ये नजर टाकली. हॉटेलच्या भिंती आणि फर्निचर जुनं दिसत होतं. यामुळे तर लोक इथं येत नसावेत? पण ती शक्यता मी फेटाळून लावली. बऱ्याच गावातली यापेक्षा जुनी आणि गचाळ हॉटेलं जोरात चालत असलेली मी पाहिली होती. याच हॉटेलच्या पुढच्या चौकात एक ब्रजवासी नावाचं हॉटेल होतं. तेही गचाळच होतं… पण तिथं नेहमीच गर्दी दिसायची. काही हॉटेल्सचं नशीबच वाईट असतं. नाहीतर, इतकी चांगली चव असताना लोकांनी याकडे पाठ नसती फिरवली!

    हेही वाचा – कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

    मिसळ खाऊन झाल्यावर मी चहा मागवला. गवती चहा टाकल्यामुळे तोही खूप चांगला होता. मी तिथं पडलेलं मेन्यूकार्ड पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सगळ्या पदार्थांचे रेट्स बरेच कमी होते. मी खाल्लेली मिसळ तर फक्त तीस रुपयांची होती. इतका छान चहा तोही फक्त दहा रुपयांचा होता.

    मी पैसे द्यायला काऊंटरवर आलो. चाळीस रुपये देऊन तिथल्या माणसाला म्हणालो,

    “मिसळ आणि चहा दोन्हीही छान होते.”

    तो कसानुसा हसला मग म्हणाला,

    “येत जा साहेब. तुम्ही मागेही एकदोनदा येऊन गेले होते ना?”

    “हो, बरोबर. चहा प्यायला आलो होतो.”

    त्यानंतर जेव्हा जेव्हा मलकापूरला गेलो, तेव्हा तेव्हा त्याच हॉटेलमध्ये जाऊन मी नाश्ता केला. तिथले सगळेच पदार्थ रुचकर होते. चहा तर नंबर एक होता! पण हॉटेलमध्ये नेहमी दोन-तीनच गिऱ्हाईक बसलेले दिसायचे. मला त्याचं खूप वाईट वाटायचं. एक दिवस हे हॉटेल नक्की बंद पडणार याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही.

    मधे तीन-चार महिने कंपनीनं मला मराठवाड्याचं काम दिलं, त्यामुळे मलकापूरला जायला मला जमलं नाही. चार महिन्यांनी मी परत मलकापूरला गेलो. समर्थ हॉटेलमध्ये जाऊनच नाश्ता करायचा, हे मी ठरवलं होतं. त्यानुसार तिथं गेलो तर, समर्थ रेस्टॉरंट कुठंच दिसेना! त्याजागी आता हॉटेल गुजरात दिसत होतं. म्हणजे, माझी शंका खरी ठरली होती. नावासोबत अर्थातच हॉटेलचं बाह्यस्वरूपही बदललेलं दिसत होतं. आता आलोच आहे तर, इथंच नाश्ता करू, या विचाराने मी आत घुसलो. काऊंटरवर वेगळाच माणूस बसला होता. याचा अर्थ स्पष्टच होता, पूर्वीच्या मालकाने हे हॉटेल कुणा गुजराती माणसाला विकलं होतं!

    आतमध्ये खूप गर्दी होती. एकही टेबल रिकामं दिसत नव्हतं. काय करावं, याचा विचार करत असतानाच वेटर आला. एका माणसाला सरकवून त्यानं मला बसायला जागा करून दिली. हॉटेलचा लूक पूर्णपणे बदलला होता. भिंतींना नवीन वॉलपेपर लागले होते. फर्निचर नवीन दिसत होतं. मी मेन्यूकार्ड बघितलं. पूर्वीच्या टिपिकल भजी, मिसळ, बटाटावडा या पदार्थांसोबत आता खमण ढोकळा, पुरीभाजी, मसाला डोसा, इडली, मेदूवडा असे बरेच पदार्थ नवीन दिसत होते. पदार्थांचे रेट्सही तगडे दिसत होते. मागील रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट!

    मी मिसळ ऑर्डर केली. एकंदरीत वातावरणावरून आणि गर्दीवरून मराठी माणसाला धंदा जमत नाही, हे अनेकांचं मत मलाही योग्य वाटू लागलं. मिसळ आली… त्यासोबत नेहमीचाच कांदा, दही वगैरे मालमसाला होता. पण खाण्याच्या प्लेट्स, चमचे वगैरे आकर्षक दिसत होते. मी चव घेतली. ती पूर्वीसारखीच छान होती. याचा अर्थ आचारी बदलला नव्हता! यावेळचा चहा मसाला घालून केलेला होता. तोही छानच होता. चला, मालक बदलला तरी, चव तीच पूर्वीची आहे, याचं मला समाधान वाटलं. फक्त यावेळी मला दुप्पट पैसे द्यावे लागणार होते याची कुठंतरी खंत वाटत होती…

    मी काऊंटरवर पैसे द्यायला गेलो आणि चमकलोच! मघाशी तिथं बसलेला माणूस बाहेर उभा होता आणि काऊंटरवर पूर्वीच्या समर्थ रेस्टॉरंटचा माणूस बसलेला होता. मला पाहून तो हसला,

    “नमस्कार साहेब…”

    ” नमस्कार. तुमच्या मालकाने हे हॉटेल गुजराती माणसाला विकलंय का?”

    “नाहीतर. मीच या हॉटेलचा मालक होतो आणि आहे!”

    “तुम्ही गुजराती आहात का?”

    तेवढ्यात कस्टमर पैसे द्यायला आले म्हणून मी बाजूला सरकलो. कस्टमर गेल्यावर मी परत तोच प्रश्न त्याला केला…

    “नाही, मी मराठीच आहे.”

    मी कोड्यात पडलो.

    “पण मग तुम्ही हॉटेलचं नाव का बदललं?”

    परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता!

    “साहेब, याला कारण आपली मराठीच माणसं आहेत…” तो सांगू लागला, “दोन वर्षांपूर्वी हे हॉटेल टाकलं, तेव्हा मोठ्या हौसेनं हॉटेलचं नाव समर्थ ठेवलं. वाटलं आपली मराठी माणसं स्वामी समर्थांचं नाव पाहून हॉटेलला येतील. खूप जोरात चालेल आपलं हॉटेल… पण हॉटेलचं नाव मराठी, मालकही मराठी म्हणजे हे हॉटेलही कमी दर्जाचं… असा समज आपल्या मराठी माणसांनी करून घेतला. तुम्हाला सांगतो साहेब, आपल्या मराठी माणसांना मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी खाद्यपदार्थांचा जराही अभिमान नाही. तो जर असता तर मुंबईत नव्वद टक्के हॉटेल्स परराज्यातील लोकांची दिसली नसती. तिथंच काय इथे मलकापुरातही परक्या लोकांचीच हॉटेल्स जास्त आहेत आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्राचे काय स्वतःचे खाद्यपदार्थ चांगले नाहीत?”

    हेही वाचा – धुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!

    कस्टमर आले तसा तो थांबला. कस्टमर मराठी दिसत होते, पण ते त्याच्याशी हिंदीत बोलत होते. ते गेल्यावर तो म्हणाला, “बघितलं साहेब, माणसं मराठी होती… पण हिंदीत बोलत होती. का? कारण आम्हाला मराठी भाषेचा अभिमानच नाही. महाराष्ट्रात असूनही तुम्ही मराठी माणसाशी हिंदीत बोलता. मराठी भाषा काय नॉन-स्टँडर्ड आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणे आणि इथे आम्हाला मराठीत बोलायचीही लाज वाटते. मराठी लोकांची मानसिकताच वाईट आहे, साहेब…”

    त्याचे मुद्दे मला पटत होते. बरेच मराठी डॉक्टर्स मी मराठी आहे, हे माहीत असूनही माझ्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचे आणि माझ्यासारख्या एम.आर.ना फार्मा कंपन्यांचे प्रॉडक्ट्स विकायचे असल्याने त्यांच्याशी आम्हाला नाईलाजास्तव हिंदीत बोलावं लागायचं.

    “खरंय तुमचं म्हणणं,” मी म्हणालो, “बघा ना मराठी माणसं मराठी गाणी ऐकत नाहीत, मराठी चित्रपट पाहात नाहीत. फक्त हॉटेल्सच नाहीत तर, जवळजवळ सगळे व्यवसाय नॉन-मराठी लोकांच्या ताब्यात गेले आहेत. आपल्याकडचे कॅटरर्स पाहा. बहुतेक राजस्थानी आहेत. फॅक्टरीतले कामगार बिहारी आहेत. महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोकांची राजधानी असूनही मुंबईत हिंदीच बोलणारे जास्त सापडतात. मराठी माणसांसोबत मराठी भाषाही मुंबईतून हद्दपार होतेय…”

    “अहो साहेब, मुंबईचं सोडा. आमच्या विदर्भातही तेच होत चाललंय. एक दिवस बघा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्रीही परप्रांतीयच असणार आहे आणि ही संधी आपले आपापसात भांडणारे मराठी आमदारच त्यांना देणार आहेत, हे नक्की!”

    “पण, काहो तुम्ही हॉटेल गुजरात हे नाव कसं ठेवलंत?”

    “तुम्ही पाहिलंच की, हॉटेल फारसं चालत नव्हतं. कामगारांचे पगार सुद्धा करणं मला कठीण होऊन बसलं होतं. हॉटेलमधले मराठी वेटर्स, कामगार सोडून गेले. गंमत बघा साहेब, आपले मराठी कामगार मारवाडी, सिंध्यांकडे कमी पैशांत निमूटपणे काम करतात, पण मराठी माणसाकडे जास्त पगार मिळूनही नखरे करतात… खाडे मारतात… मालकाला जमेल तसं छळून घेतात… माझी आई गुजरातची, त्यामुळे गुजराती भाषा आणि गुजराती पदार्थ आम्हाला चांगले येतात. मी हे हॉटेल टाकताना माल काढणारा मुख्य कारागिर मराठी ठेवला होता. पण तो दारू पिऊन यायचा आणि खूप खाडे करायचा म्हणून त्याला काढून मी गुजरातमधून कारागिर बोलावून आणला. तो मात्र मेहनती आणि ईमानदार होता. माझ्या पडत्या काळातही तो मला सोडून गेला नाही. त्यानंच मला हॉटेलचं नाव गुजरात करण्याचं सुचवलं. एकंदरीत परिस्थितीमुळे मलाही ते पटलं. मग मी नाव तर बदललंच पण आतलं इंटिरिअरही बदलून टाकलं. त्याच कारागिरानं गुजरातमधले कामगार बोलावून घेतले. आता माझ्याकडचा सगळा स्टाफ गुजराती आहे. हे लोक कधीच मराठी माणसांसारख्या दांड्या मारत नाहीत… दारू पिऊन येत नाहीत… पगार उशिरा दिला म्हणून भांडणं करत नाहीत… सध्या सगळं सुरळीत चालू आहे… हॉटेलचं नाव गुजरात ठेवल्यामुळे लोकांना हॉटेल उच्च दर्जाचं वाटून ते इथंच नाश्ता, चहाला येतात.”

    ” खरंय. सध्या तर बसायला जागा मिळत नाहीये,” मी हसत म्हणालो तसा तोही हसला.

    “तुम्हांला ते पुढच्या चौकातलं ब्रजवासी हॉटेल माहीत आहे का?”

    “हो माहितेय, पण मला ते आवडत नाही. गचाळ आहे…”

    “बरोबर. तरीही त्याच्याकडे अगोदर खूप गर्दी असायची. आता तिकडचे गिऱ्हाईक आपल्याकडे यायला लागलेत!”

    मी घड्याळाकडे पाहिलं. मला आता निघायला हवं होतं. साडेदहाची डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. मी बिलाचे 80 रुपये काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यानं 40 रुपये मला परत केले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला,

    “असू द्या साहेब. तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात!”

    मी 40 रुपये परत करत म्हणालो,

    “तुम्ही हॉटेलचं नाव गुजरात केलं, आता मराठी माणसांची मानसिकता सोडून गुजराती लोकांसारखे व्यवहारी व्हा. धंदा म्हणजे धंदा. कस्टमर कुणीही असो… नो डिस्काऊंट!”

    त्यानं हसून 40 रुपये गल्ल्यात टाकून दिले. त्याच वेळी तिथं आलेल्या दोन-तीन कस्टमरचेही पैसे त्यानं घेतले. ते गेल्यावर तो म्हणाला,

    “साहेब पुढच्या महिन्यापासून आपण वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था करतोय. पंजाबी, गुजराती, मारवाडी, जैन सगळ्या प्रकारच्या थाली मिळतील. या कधी जेवायला…”

    “…आणि महाराष्ट्रीयन थाळीचं काय?”

    तो हसला,

    “काय करता साहेब… आपल्या मराठी माणसाला आपलं घरचं जेवण हॉटेलमध्ये नको असतं. त्यांना हॉटेलमध्ये जे जेवायला आवडतं, तेच आपल्याला ठेवावं लागणार ना!”

    अर्थातच, त्याच्या या युक्तिवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.

    बडीशेप खाऊन मी निघालो.

    रविवारी माझ्या घरी पाहुणे येणार होते. बायको मला म्हणाली, “अहो, उद्या त्या बिकानेर स्वीट मार्टमधून एक किलो श्रीखंड घेऊन याल?”

    “का आपल्या जवळच्या दत्त डेअरीतही चांगलं श्रीखंड मिळतं, तिथून का नाही आणायचं?”

    “नको तिथलं नको. राजस्थानी लोकांकडचे सगळे पदार्थ चांगले असतात!”

    “अहो मॅडम, मराठी लोकांकडचे पदार्थ चांगले नसतात, ही मानसिकता सोडून द्या आता… आपलेही लोक चविष्ट पदार्थ बनवतात. तू स्वतः मराठी आहे, तू काय चवदार पदार्थ बनवत नाहीस? दत्त डेअरीचा मालक मराठी असला तरी, त्यांचं श्रीखंड बिकानेरवाल्यापेक्षा जास्त चांगलं असतं… आणि एक गोष्ट लक्षात घे, श्रीखंड हा महाराष्ट्रीय पदार्थ आहे. तो मराठी माणसं चांगला करतील की राजस्थानी? तूच तर म्हणतेस ना की, इडली, डोसा साऊथ इंडियन जितका चांगला करतात तितका आपला नसतो. छोले भटूरे पंजाबी लोक जसे बनवतात, तसे आपल्याला जमत नाहीत. मग हीच बाब श्रीखंडाला का लागू होत नाही?”

    या प्रश्नावर बायको निरुत्तर होणार हे मला माहीत होतं… झालंही तसंच! माघार घेत ती म्हणाली, “ठीक आहे, श्रीखंड दत्त डेअरीतून आणा!”


    मोबाइल – 9209763049

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn