Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
    ललित

    एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारNovember 25, 2025Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, सारे प्रवासी घडीचे, जयवंत दळवी, कोकणदर्शन, कोकण वर्णन, कोकणी माणसं, कोकणी व्यक्तिरेखा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘नातीगोती’ यासारखी नाटके, ‘चक्र’ सारखी कादंबरी आणि चित्रपट , ‘ठणठणपाळ’ सारखे खुशखुशीत सदर आणि बरंच काही लेखन प्रसिद्ध असलेल्या जयवंत दळवींचे 1964 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक ‘सारे प्रवासी घडीचे’! आपू नावाच्या मुलाची ही कथा आहे. लेखकाने इतकं जिवंत वर्णन केले आहे की, हे काल्पनिक आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कोकणातले एक गाव आपल्या कल्पनाशक्तीने त्यांनी आपल्यासमोर उभे केले आहे. त्यात मोजता न येण्याइतकी पात्रे बारीकसारीक तपशीलांसकट आली आहेत. लेखकाच्या खुमासदार शैलीमुळे वाचताना गालातल्या गालात हसू, ते पुढची अक्षर दिसू नयेत इतकं डोळ्यांत पाणी येईपर्यंतचे हसू… येते. सगळा विनोद निर्मळ, निरागस आहे. जसे हसू तसे काही वेळा खिन्नताही दाटून येते. परंतु सगळे कथन प्रांजळ आहे असे वाटत राहते. त्यांनी लिहिले आहे, इथली माणसे परिस्थितीमुळे जशी वागावी तशी वागली. आत एक बाहेर एक असा प्रकार नाही. वागण्यात सांगड नव्हती. स्वभावावर बेगड नव्हती.

    उशाशी डोंगर, पायाशी समुद्र आणि पायाखाली लाल माती असे वर्णन ते करतात. कोकणच्या किनारपट्टीवर असलेले नकाशात स्थान नसलेले हे लहानसे गाव. एकोणीस लेखांत गावातल्या वेगवेगळ्या माणसांचे, त्यांच्या व्यवसायांचे, भौगोलिक परिस्थितीचे वर्णन यात येते. त्यांची ठसकेबाज भाषा येते. या भाषेचा स्वादच वेगळा. आपू शिक्षण झाल्यावर गाव सोडून मुंबईत स्थायिक झाला आहे. तो गावातल्या घरात एकटाच येतो, तेव्हा रिकाम्या घरात त्याच्या आठवणी उचंबळून येतात. त्याच तो सांगतो आहे…

    आपूला शाळेत घालण्यासाठी मुहूर्त पाहायला भटजी घरी येतात, तेव्हा आजोबांच्या सारखा ‘माझ्याही तेराव्याचा मुहूर्त’ पाहत आहेत का? असे त्याला वाटते. मग त्याची उचलबांगडी, आई-आबांनी जबरदस्तीने शाळेत पाठवणे, आजीचा क्षीण विरोध, तोही आता तिला चोरून विडया कोण आणून देईल, म्हणून! अशा प्रकारे हा प्रसंग रंगवला आहे. शाळेतले मास्तर, पावटे मास्तरांची काढलेली खोड, वर्गातली मुले.. अशा शाळेतल्या गमतीजमती आहेत. त्यातले स्नेहसमेलनातले अंगविक्षेपासह सादर केलेल्या ‘देवाजीने करुणा केली भाते पिकुनी पिवळी झाली…’ गाण्याच्या वेळी उडालेली धमाल वाचताना हसून हसून डोळ्यांत पाणी येतं.

    आपूचे वडील आबा गावातले मोठे प्रस्थ. त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांचा शत्रू बाबुली. त्या दोघांचे वैर इतके जुने की कधी सुरू झाले, हे दोघांना माहीत नाही. दोन माडांच्या मालकी हक्कावरून दोघे कोर्टात जाऊन इतके भांडले की माड सुकले तरी दाव्याचा निकाल लागला नाही. या दोघांनी एकमेकांवर कुरघोडी करायचे जे प्रयत्न केले, तेही विनोदी पद्धतीने रंगवले आहेत. चुगलखोर शांतू न्हावी, दारूबाज मुंगी हवालदार, झिलू, नरूच्या आईचे पैसे खाणारे वामन दाजी, त्यांनी गायलेले अभंग, आबांची हरवलेली सोन्याची अंगठी मिळाल्यावर आणून देणारा रंगल्या या व्यक्तिरेखा येतात. बालमित्र नरु, त्याची आई यांची करूण कहाणी येते…

    हेही वाचा – स्मृतिचित्रे… लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मवृत्त!

    रवळनाथ हे गावाचे दैवत. आबांची रवळनाथावर श्रद्धा इतकी की, त्याला कौल लावल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही. रवळनाथ स्वप्नात येऊन कामे करवून घेतो यावरही त्यांचा विश्वास होता. गावातल्या सर्वांची श्रद्धा असल्याने सर्वांमध्येच त्याची भीती होती. तिथे भूत काढणे वगैरे प्रकार व्हायचे. तसेच बाबुली आणि आबा दोघांनी एकमेकांविरुद्ध एकच वेळी त्याला नवस बोललेले असायचे. एकदा पिकांवर कीड पडलेली असताना आबा त्याला गाऱ्हाणे घालतात आणि नंतर पाखरांची टोळी येऊन सर्व कीड टिपून खाते. अशा प्रसंगांमुळे सर्वांचा विश्वास असतो की, तो त्यांचे रक्षण करतो!

    दशावतारी जीवा, त्याची मंडळी, नाटकं, त्याची नाटकाच्या कपड्यांची पेटी, दादूने लिहिलेले द्रौपदी वस्त्रहरण नाटक, द्रौपदीची लुगडी मोजताना दु:शासनाची झालेली चूक, लुगडी ओढल्यामुळे गोल गोल फिरून आपटल्याने आलेली टेगळे इत्यादी वाचताना हसून पुरेवाट होते. डॉ. रामदासी सहभोजनाच्या वेळी पूर्णान्न करतात, तेव्हा ढवळायला काही न मिळाल्याने अख्खा हात पातेल्यात घालतात. ते बघितल्यावर कोणी पूर्णान्न खात नाही आणि नरू, कुत्रे तरी खातंय का पाहतो, असे म्हणतो.

    तात्या रेडकर निसर्गावर प्रेम करत असतो म्हणून त्याला ‘हाफम्याड तात्या’ असे टोपण नाव असते. त्याचा मुलगा पुढे कम्युनिस्ट होतो तेव्हा ‘आमका वाटला तुझ्या घराण्यात फक्त एकच हाफम्याड असा’ असे म्हणून खिल्ली उडवतात.

    चरखो फिरवून स्वराज्य गावला असता तर, नांगर फिरवून शेतात पीक आयला नसता?… गांधीला मारले ते वाईट झाले. वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? नेहरूंनी पाठवलेले आंबे इंग्लंडच्या राणीला आवडले, हे वाचताच फुकट गावले तर वायट कित्याक? हे त्यांचे तत्वज्ञान! बर्नार्ड शॉने दाढीवर रस सांडीत रत्नागिरीचे हापूस आंबे खाल्ले हे वाचताच ‘म्हातारो आंब्याचा बाटो गळ्यात अडकून मेलो नाय ह्या खूप झाला…’ असे लोक म्हणाले. गावातल्या लोकांचे असे बोलणे वारंवार वाचायला मिळते.

    पेस्तवच्या दुकानात सगळे भेदभाव विसरून दारू पिणारे गावकरी, त्याचे खोपटे जाळल्यावर लगेच उभारून देणारे लोक, गांधी हत्येनंतर जाळपोळ न होणारे गाव ही माणसांची चांगली बाजू लेखक सांगतो.

    ‘सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी, कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला अडकवलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. हात घातला तर त्याला कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही… उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून मारला तरी तो लागणार नाही.’ गावातल्या शेतकऱ्याबद्दल लेखकाने असे लिहिले आहे. अहिंसा वगैरे तत्व माहीत नसलेली ही अशिक्षित माणसे जीवनाचे साधे तत्वज्ञान जाणून होती. त्यांच्या जगण्यातला साधेपणा, त्यांच्या कमी गरजा… हे सर्व अनेक व्यक्तीरेखांतून दिसते. पाण्याचे दुर्भिक्ष आणि त्यामुळे झालेली गरिबीची, कमतरतेची सवय मन खिन्न करते.

    हेही वाचा – आठवणींचा एक कोपरा हळुवार उघडणारी… ‘शाळा’

    नाटकातली खोटी मिशी हरवण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून कोर्टात जाणाऱ्या माणसांबद्दल वाचून गंमत वाटते, पण वैषम्यही वाटते. मी गांधीजींची अनेकदा हजामत केली, अशी फुशारकी मारणाऱ्या न्हाव्याला खऱ्या-खोट्याची विचारपूस करण्याआधी, ‘त्यांनी उधारी ठेवली नाही ना?’ असा प्रश्न लोकांनी विचारला.

    कोकणातल्या माणसाच्या स्वभावाचे कंगोरे लेखकाने खास शैलीत लिहिले आहेत. कुठल्याही गोष्टीचे फारसे सुख किंवा दुख न मानणारी ही माणसे रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असतात. आपूचे गाव कोकणच्या त्या काळातल्या गावांचे प्रातिनिधिक रूप आहे. कोकणची संस्कृती गुणदोषांसकट लेखकाने मांडली आहे. अगदी इतिहास सांगावा, तशी पारदर्शकतेने. आता गावात तो परका झाला आहे. मुंबई त्याला परकी आणि तो गावाला परका हे त्याचे दु:ख आहे. आपू एकाकी झाला आहे… त्याच्या या जीवनाच्या प्रवासात त्याला भेटलेले प्रवासी घडीभर साथीपुरतेच होते. मग ते आबा, आई असोत की मास्तर असोत की, बालमित्र असोत.

    दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,

    एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ

    क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा

    गीतरामायणातल्या या ओळींत सार आले आहे.

    हे पुस्तक कधीही, कुठल्याही पानावरून, कितीही वेळा वाचावे असे आहे. प्रत्येक वेळी आसू आणि हसू येतातच. मी कितीदा तरी वाचले आहे तरी, पुन्हापुन्हा वाचावेसे वाटते. घडीभरात पुस्तक वाचून पूर्ण होते, पण जीभेवर गोड चव रेंगाळावी, तसे माधुर्य रेंगाळत राहते.

    Author

    • डॉ. अस्मिता हवालदार
      डॉ. अस्मिता हवालदार
    डॉ. अस्मिता हवालदार

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn